राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमते… पण मतांचे काय शरद पवार यांचे कळीच्या मुद्द्यावर बोट
राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमते... पण मतांचे काय शरद पवार यांचे कळीच्या मुद्द्यावर बोट

राज ठाकरे यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होते, मात्र त्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. मनसेला अपेक्षित मते मिळत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या सभांनादेखील गर्दी होते. मात्र ती गर्दी मतांमध्ये परिवर्तित होते. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वात यश मिळते, हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबईत काय परिणाम होईल, असा प्रश्न शरद पवार यांना अनौपचारिक चर्चेत विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अनुभवातून आलेले स्पष्ट मत मांडले. पवारयांच्या विधानातून स्पष्ट होते की, फक्त सभा गाजवल्याने यश मिळत नाही, तर मतदारांशी असलेला संवाद, विश्वास आणि संघटनशक्तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांची वक्तृत्वशैली लोकांना आकर्षित करते. मात्र प्रत्यक्ष मतदानात त्याचा परिणाम कमी प्रमाणात दिसतो. त्याउलट उद्धव ठाकरे यांचा संवाद आणि जनाधार अधिक ठाम आहे, असे संकेत पवार यांनी दिले आहेत.
तसेच पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने (मविआ) एकत्र लढल्या पाहिजेत. कारण महायुतीमध्ये जागावाटप व्यवस्थित होईल असे वाटत नाही. त्यामुळे त्याचा फायदा मविआला होऊ शकतो. यातून शरद पवारांनी सूचित केले की, भाजप, शिंदे गट यांच्या महायुतीमध्ये अंतर्गत वाद किंवा मतभेद संभवतात, जे जागावाटपात अडथळा ठरू शकतात. अशा वेळी मविआ एकत्र राहिल्यास त्यांना संधी अधिक मिळू शकते.